महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला असून, नाताळच्या मुहूर्तावर राज्यात थंडीचा कडाका अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. हवामान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या उत्तर भारताकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव राज्याच्या उत्तर भागापर्यंत पोहोचला आहे. यामुळे येत्या काही दिवसांत किमान तापमानात मोठी घट नोंदवली जाणार असून, डिसेंबरअखेरपर्यंत ही स्थिती कायम राहील.
राज्यातील विविध शहरांचे तापमान
हवामान अभ्यासकांनी नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील अनेक शहरांमध्ये पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. नाशिक, जळगाव आणि मालेगाव येथे तापमान ९.५ ते ९.८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले गेले असून उत्तर महाराष्ट्र गारठला आहे. पुणे शिवाजीनगर भागात ९.९ अंश सेल्सिअस तापमानामुळे पुणेकरांना हुडहुडी भरली आहे. विदर्भाचा विचार करता नागपूर १०.६ अंश, गोंदिया ९.६ अंश आणि यवतमाळ १०.६ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. सोलापूर आणि कोल्हापूर सारख्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये सरासरी १३ ते १५ अंश सेल्सिअस तापमान असून उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय असल्याने थंडीची लाट कायम आहे.
थंडीचा कडाका किती दिवस टिकणार?
हवामान अभ्यासकांच्या विश्लेषणानुसार, सध्याची ही थंडी ३० ते ३१ डिसेंबरपर्यंत म्हणजेच नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अशीच टिकून राहील. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात उत्तरेकडील वारे प्रबळ राहिल्याने रात्रीच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. मात्र, जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला वाऱ्यांची दिशा बदलण्याची शक्यता आहे. हिमालयावर नवीन पश्चिमी विक्षोभ सक्रिय होणार असल्याने आणि पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे जानेवारीच्या सुरुवातीला थंडीचा जोर काही प्रमाणात कमी होऊ शकतो.
जानेवारीमध्ये पुन्हा थंडी परतणार?
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात थंडीत काहीशी घट जाणवली तरी हा दिलासा तात्पुरता असेल असे हवामान अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. जसा हिमालयावरील पश्चिमी विक्षोभ पुढे निघून जाईल, तसा पुन्हा एकदा उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह महाराष्ट्राकडे सुरू होईल. त्यामुळे जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला देखील थंडीचा कडाका पुन्हा एकदा जाणवण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात कुठेही पावसाची शक्यता नसून हवामान कोरडे राहील, जे रब्बी पिकांसाठी फायदेशीर ठरेल.